Wednesday, August 25, 2010

स्वागत समारंभ २०१०

आय आय एस सी मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या मराठी विद्यार्थ्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ शुक्रवार दिनांक ६ ऑगस्ट ला संध्याकाळी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. चहापानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अविनाशच्या हस्ते गणेशपूजन झाले. त्यानंतर शंतनुने सर्वांना मराठी मंडळाची ओळख करून दिली.


कार्यक्रमास सुरुवात करण्यापूर्वी मराठी मंडळातर्फ़े रानडे ग्रंथालयासाठी ह्या वर्षी ५ पुस्तकांचा संच देणगी म्हणून देण्यात आला. हा संच अमृतच्या हस्ते ग्रंथपालांकडे सुपूर्त करण्यात आला. हृषिकेशने सर्वांना रानडे ग्रंथालय व तेथे उपलब्ध असलेल्या मराठी पुस्तकांविषयी  सर्वांना माहिती दिली.

यानंतर खेळास सुरुवात झाली. समीहन आणि शिल्पाने खेळाचे स्वरूप समजावून सांगितले. पहिल्या खेळामध्ये आपापल्या गटांमध्ये चेंडू फ़िरवायचा होता, आणि गाणे थांबताच ज्याच्याकडे चेंडू असेल त्या सर्वांनी पुढे येऊन एखादी सांगितलेली गोष्ट करून दाखवायची व नंतर आपली ओळख सर्वांना करून द्यायची, असे स्वरूप होते. जसजसे एक एक गडी बाद होत गेले, तसतसे खेळही अवघड होत गेले व उत्कंठा वाढत गेली. सर्वांची ओळख झाल्याबरोबर खेळ संपला.

दुसर्‍या खेळासाठी सर्व गटांना काही सामग्री देण्यात आली. त्यांना चिठ्ठ्यांवर ५ असंबद्ध शब्दही देण्यात आले. हे शब्द जोडून काहीतरी अर्थपूर्ण प्रसंग समोर सादर करायचा होता. ह्याच्या तयारीसाठी २० मिनिटे वेळ देण्यात आला. सर्वांनी आपल्यामधला कलाकार पणाला लावून शक्कली लढवल्या.
वेळ संपताच एकेका गटाने प्रसंगाचे सादरीकरण केले. त्यातील प्रासंगिक विनोदांचा सगळ्यांनीच आनंद लुटला. शेवटी विजेत्या गटाला बक्षिस देण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी नारळीपोळी, भजी असा बेत होता. त्यांवर ताव मारून, पुन्हा कायम भेटत राहण्याच्या इराद्यानेच सगळे परतले.

No comments:

Post a Comment